Saturday, February 27, 2010

पाश्र्वनाथ कॉलेजचा संप मागे ; विश्वस्ताने घेतली राज ठाकरे यांची भेट?


ठाणे, २५ फेब्रुवारी/प्रतिनिधी
पाश्र्वनाथ इंजिनिअरिंग कॉलेजमधील अनागोंदी कारभाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचे शिक्षण मंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणीत पाश्र्वनाथ कामगार संघटनेने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला. आठ दिवसानंतर आज महाविद्यालय सुरू झाले आणि मुंबई विद्यापीठाची सत्यशोधन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाची समिती महाविद्यालयात दाखल झाली. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचा दावा महाविद्यालयाचे प्रमुख विश्वस्त टेकचंद शहा यांनी केला आहे.
कासारवडवली येथील पाश्र्वनाथ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचेही शोषण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचे जप्त केलेले मोबाईल फोनसुद्धा गायब झाल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या असून त्यापैकी एका पालकाने पोलीस ठाणे गाठले होते. भरमसाठ डोनेशन आणि शुल्क आकारूनही कॉलेजमध्ये सुविधांचा अभाव आहे. नवीन इमारतीचे अर्धवट बांधकाम असतानाही महाविद्यालय त्या जागेत हलविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना धोका संभविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बिकट परिस्थितीत काम करताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक करण्याच्या अनेक घटना घडल्या. या विरोधात पाश्र्वनाथ कामगार संघटनेने आवाज उठवून मनसेचे नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली १७ फेब्रुवारीपासून संप पुकारला. याची दखल घेऊन तंत्रशिक्षण खात्याची समिती चौकशीसाठी दाखल झाली आणि काही कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विश्वस्तांना काळे फासून एकाला मारहाण केली. परिणामी, प्रशासनाने महाविद्यालयाला टाळे ठोकले. हे प्रकरण चिघळू लागले आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे पाहून आमदार संजय केळकर व राजन राजे यांनी शिक्षण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. शिक्षणमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्याची काल घोषणा करण्यात आली. त्यामुळे आज नेहमीप्रमाणे महाविद्यालय सुरू झाले. ते सुरू झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी आज तंत्रशिक्षण संचालनालयातील दोन सदस्यांनी महाविद्यालयास भेट दिली. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीचे डॉ. कृष्णा पाटील, प्राचार्य जे.एम. पाटील, वैभव नरावडे या सदस्यांनी चौकशी केली. याचा अहवाल विद्यापीठाला देऊन विधी विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन समितीने विद्यार्थी व संघटनेला दिले. मंगळवापर्यंत ठोस कारवाई न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा राजे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment